All Marathi Stories
सैपाकी
पालीच्या बाजारात गोपू व रघू हे बालमित्र कित्येक दिवसांनी परस्परांना अचानक भेटले. लग्न झाल्यानंतर दोघे निरनिराळ्या गावात राहू लागले होते. गोपू व्यापार करू लागला. त्याच्या बायकोचे नाव शांताबाई होते. दोघांना एक मुलगा होता. त्याचे लग्नाचे वय झाले होते.
रघू शेतकामात रमला होता. त्याची बायको रुक्मिणी हुशार होती. त्यांना सतरा-अठरा वर्षांची एक मुलगी होती व तिचे लग्नाचे वय झाले होते.
दोघांचा व्यवसाय निराळा होता, परंतु एका गोष्टीत त्यांच्या आयुष्यात साम्य होते. दोघांच्या बायका फार आळशी होत्या. त्या कधी स्वयंपाक करीत नसत. नवऱ्याला सुद्धा भात उकळून वाढीत नसत. त्यांना स्वयंपाक करता येत नव्हता असे मुळीच नाही. परंतु स्वयंपाक करणे त्यांना आवडत नसे. नाइलाजाने त्यांना स्वयंपाक करावाच लागे तेव्हा त्या असा करीत की खाववत नसे व सर्वांना उपाशी राहावे लागे. म्हणून दोघे मित्र घरी आल्यावर स्वयंपाकही करीत.
दोघे बाजारात भेटले तेव्हा दोघांना त्यांच्या बायकांचा हा आळशीपणा घालवायला एक युक्ती सुचली. असे ठरलं की गोपूच्या घरी रघूने व रघूच्या घरी गोपूने जायचं व स्वतःची ओळख जाणून सांगायची, त्याप्रमाणे दोघे मित्र परस्परांच्या घरी अचानक पोचले आणि त्यांनी आपआपली ओळख जाणून सांगितली.
रघू शांताबाईंना म्हणाला- "अहो वहिनी, म्हणजे गोपू घरी नाही म्हणता, मग कसं व्हायचं हो? अहो, मी तुमच्याकडे आपल्या मुलीकरिता स्थळ पाहायला आलो होतो." शांताबाईंना परमानंद झाला, रघू बाजाराकरिता आला होता, म्हणून त्याचा पोषाख त्या दिवशी श्रीमंतासारखा दिसत होता. मुलाला चांगला हुंडा मिळण्याची आशा तिला वाटू लागली. "येतील हो बाजारात गेले आहेत!" असे सांगून शांताबाईने सुग्रास जेवण तयार करून पाहुण्यांना वाढले. गोपू घरी परतला नाही. तरी शांताबाई रघूला आग्रह करून म्हणाली- "भावजी, उद्या नक्की परत येतील, तुम्ही थांबलं पाहिजे."
चार दिवस झाले, तरी गोपू परतला नाही. रघूने गोपूच्या घरी चारही दिवस खूप मेजवान्या उडविल्या. शेवटी शांताबाईंना हे सांगून की आता मात्र घरी परतलेच पाहिजे, गोपू आपल्या गावी निघाला. रघू निघाल्यावर दुसऱ्याच दिवशी गोपू परतला.
तिकडे रघूच्या बायकोने गोपूचा आतिथ्य सत्कार चार दिवस केला. दररोज नवे पक्वान्न तयार होई. तिचा आळशीपणा कोठे गेला कोणास ठाऊक? गोपूला मेजवान्या मिळत होत्या. त्याने सुद्धा रघू येईल म्हणून चार दिवस वाट पाहण्याचे नाटक केले आणि घरी जाणे आवश्यक असल्याचे सांगून पांचव्या दिवशी आपल्या वहिनीचा निरोप घेतला.
दोघे आपआपल्या घरी आले तेव्हा त्यांना त्यांच्या बायकांनी त्यांचे मित्र स्थळाच्या चवकशीसाठी आल्याचे सांगून वाट पाहून शेवटी निराश होऊन परतल्याचे सांगितले. नंतर दोघांच्या बायकांनी लग्नाविषयी बोलणी करायला आपआपल्या नवऱ्याच्या मागे तूपणे लावले. दोघे मित्र पुढल्या आठवड्याच्या बाजारात भेटले आणि त्यांच्या त्यांच्या बायकांकडून कसा पाहुणचार झाला याच्या गमती परस्परांना सांगून त्यांनी त्यांची युक्ती यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करीत पुढला कार्यक्रम ठरवून आपआपल्या घरी परतले.
गोपू परतल्यावर शांताबाईनी त्याला विचारले- "मग काय झालं हो? भावजी काय म्हणाले स्थळाविषयी?" गोपू राग आल्याचा अभिनय करीत उत्तर दिले- "ते किती श्रीमंत झाले, म्हणून काय झाले, इतका गर्व करण्याची त्यांना गरज काय होती? हे स्थळ नको!"
"असे झालं तरी काय?" शांताबाईंनी विचारले. "व्हायचं काय? म्हणाला, त्यांची मुलगी म्हणणे स्वयंपाक करणार नाही. म्हणजे लग्नानंतर आपला मुलगा तिला स्वयंपाक करून वाढणार का?" गोपूने रागाचा आव आणून विचारले.
"इश! ते कसं होईल? काहीतरीच बाई!" शांताबाई म्हणाली.
"रघूला कोणीतरी सांगितल्यासारखं दिसत आहे की आपल्या घरात स्वयंपाक मलाच करावा लागतो म्हणून! आणि मला कळलं आहे की त्याची बायको सुद्धा स्वयंपाक करीत नाही!" गोपू म्हणाला. शांताबाईंना वाटू लागलं की आपल्या अशा वागणुकीमुळे एक चांगलं चालून आलेलं स्थळ हातातून निसटणार. ती नवऱ्याला म्हणाली- "तुम्ही जाऊन त्यांचा गैरसमज दूर करा. सांगा की माझी तब्येत कधी बरोबर नसली, म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो. बाकी नेहमी मीच स्वयंपाक करते."
"हे गं काय तुझं म्हणणे? त्यांनी मला येऊन तोंडावर हे थोडेच सांगितले! मी आपल्या तर्फे हे जाऊन सांगू लागलो तर माझंच हसं होईल. एक चांगलं स्थळ हातातून निसटतं आहे, एवढे मात्र खरे!" गोपू असं म्हणत गप्प झाला.
तिकडे रघू उदास चेहरा घेऊन घरी परतला व म्हणाला- "आतां मी तरी काय सांगू आपल्या नशिबातच नाही, हे चांगलं स्थळ चालून आलेलं परत गेलं!"
"म्हणजे झालं तरी काय?" रुक्मिणीने विचारलं.
"ते म्हणाले, लग्न झाल्यावर सैपाक्याला काढून आमच्या मुलीकडून ते स्वयंपाक करविणार म्हणे! त्यांना कळलं म्हणे की आमच्या घरी पुरुषच स्वयंपाक करतात!"
"पण, हे काय बोलणं झालं? तुम्ही स्वतःच हौशीने स्वयंपाक करतां! मी स्वयंपाक करणार नाही असे कधी म्हटलं का? तुम्ही घरी नव्हता तेव्हा मी नव्हता का सर्व स्वयंपाक करून त्यांना वाढला. दररोज नवं पक्वान्न वाढलं मी त्यांना! भावजींना चार दिवस मीच स्वयंपाक करून वाढलं नव्हतं का?" रुक्मिणी म्हणाली.
"मग तुझं म्हणणं काय?" रघूने विचारलं.
"आमची मुलगी स्वयंपाक का नाही करणार? एक स्वयंपाक करण्याची गोष्ट घेऊन का चांगलं स्थळ हातचं जाऊ द्यायचं? तुम्ही आता जाऊन मुहूर्त ठरवून या." रुक्मिणीने रघूला आग्रह केला.
रघू गोपूडे जाऊन म्हणाला- "मित्रा, आणि वहिनी! माझी मुलगी स्वयंपाक करायला तयार आहे. मग ठरवायचा का मुहूर्त?" ते ऐकून शांताबाईंना भांड्यात जीव पडल्यासारखं वाटलं. रुक्मिणीला रघूकडून मुहूर्त ठरल्याचे कळलं तेव्हा ती शपथ घेऊन म्हणाली- "देवा! मी कान धरते, यापुढे मी ह्यांना कधी स्वयंपाक घरात पाऊल टाकू देणार नाही."
लग्नकार्य उरकल्यावर सर्व गुपित प्रगत झालं. कृत्रिम परिस्थिती नाहीशी झाली आणि रघूला आणि गोपूला स्वयंपाकाच्या कामातून कायमची सुटका मिळाली.