सचोटी व इमान
एका जमीनदाराकडे महादू नावाचा एक माळी आणि कृष्णा नावाचा घरकाम करणारा नोकर होता. दोघे जवळजवळ एकाच वेळी कामाला लागले. परंतु दोघांचे परस्परांशी थोडेदेखील पटत नसे.
एकदा जमीनदार कृष्णाला बरोबर घेऊन फिरत फिरत आपल्या मळ्यात आला. त्या वेळी महादू झाडांना पाणी लावीत होता. जमीनदार काही वेळ महादू झाडाला पाणी लावण्याचे काम नीट करीत असल्याचे पाहत होता. त्याला समाधान वाटले. तो निघून गेला. कृष्णासुद्धा त्याच्याबरोबर निघून गेला. ते दोघे उभे होते तिथे महादूला काहीतरी चकाकत असल्याचा भास झाला. जवळ जाऊन त्याने पाहिले तर ती जमीनदाराची हिऱ्याची अंगठी होती.
"चूकून पडली असेल! ही मलाच मिळाली म्हणून बरं झालं, ती त्या कृष्णाच्या हातात पडली असती तर काय झालं असतं, सांगायला हवं का?" महादूने विचार केला.
इतक्यात त्याला एक चलाखीची गोष्ट सुचली. त्याने आजूबाजूला पाहिले आणि चटदिशी अंगठी कंबरेला खोचून ठेवली आणि सर्व जण झोपल्यावर कृष्णाच्या खोलीच्या बाजूला गेला.
महादूला पाहिजे होते तसे कृष्णाच्या खोलीचे दार सताड उघडे होते. त्याने आत वाकून पाहिले. कृष्णा अजून झोपलेला नव्हता, आपली पेटी उघडून काहीतरी शोधीत होता. शेवटी पेटीतून काहीतरी त्याने काढून घेतले आणि मुठीत ठेवून पेटी बंद करून बाहेर येऊ लागला.
महादू बाजूला आड उभा राहिला आणि कृष्णाला बाहेर जाऊ देऊन मांजराच्या पावलाने खोलीत गेला. त्याने पेटी उघडून अंगठी पेटीत खाली ठेवून दिली आणि बाहेर आला.
तेव्हा त्याला इतर गोष्टी सुचू लागल्या. तो विचार करू लागला. मध्यरात्रीच्या वेळेला कृष्णा कोठे बरे बाहेर निघाला असावा? त्याने मुठीत काय ठेवले असावे? तो जास्त वेळ न थांबता झपझप पावले टाकीत कृष्णाच्या पाठोपाठ गेला.
कृष्णाने मळ्यात जाऊन तेथे कालव्याच्या काठच्या एका झाडाच्या ढोलीत काहीतरी लपवून ठेवले. सामान्यपणे महादू दररोज स्नानाला जाई तेव्हा त्याच ढोलीत आपले कपडे ठेवीत असे. त्या ढोलीत कृष्णाने काय बरे ठेवले असेल, पहावे असे साहजिकच महादूला वाटले. कृष्णा परत निघून गेल्यावर महादू त्या ढोली जवळ गेला. परंतु इतक्यात त्याच्या डोक्याला जोराने कसला तरी मार बसला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला.
तो शुद्धीवर आला तेव्हा तो आपल्या खोलीत पोहोचलेला होता. कृष्णानेच आपल्याला पाठीमागून पाहून मारले असेल व उजाडल्यावर त्याच्या समाचाराला जाण्याचे त्याने मनाशी ठरविले.
दुसऱ्या दिवशी जमीनदाराने आपल्या दोघां नोकरांना बोलावून घेतले व विचारले— "माझ्या मनगटातली सोन्याची साखळी कोणीतरी उडवलेली दिसते आहे. ते काम तुमच्या दोघांशिवाय इतरांचे कोणाचे असणे शक्य नाही. बोला कोणी घेतली आहे ती, नाहीतर दोघांची चामडी लोळवितो."
ते ऐकून महादू चकित झाला. अंगठी हरविली होती आणि जमीनदार सोन्याची साखळी गेली म्हणतो आहे, हे काय? परंतु कृष्णा मात्र नि:संकोचपणे म्हणाला— "चोर महादू आहे. मालक! तो मळ्यात रात्री काहीतरी लपवून ठेवीत असताना मी पाहिलं त्याला. पाहिजे तर दाखवितो." असे म्हणत तो जमीनदाराबरोबर त्या झाडाजवळ गेला.
परंतु ढोलीत हात घालून चाचपडून कृष्णाने पाहिले व मनात म्हणाला— "इकडेच तर लपवून ठेवली होती? कोठे गेली?"
कृष्णाची लबाडी महादूला कळली. आपल्यावर चोरीचा आळ आणण्यासाठी जमीनदाराची साखळी या लबाडाने या झाडाच्या ढोलीत लपविली होती तर! परंतु कोणता तरी दुसराच चोर आपल्या पाठीमागून येऊन आपल्या डोक्यात मारून ती साखळी काल घेऊन गेला!
महादूला कृष्णाचा भयंकर राग आला. तो जमीनदाराला म्हणाला— "साखळी चोरणारा चोर कोण हे मला माहीत आहे. मुळात अंगठी हरवल्याचे आपल्याला माहीत नाही वाटते. दोन्ही कृष्णानेच उडविल्या आहेत. असे माझ्याबरोबर या जरा!" असे म्हणत जमीनदाराला कृष्णाच्या खोलीत घेऊन गेला. पेटी उघडून पाहिली. परंतु तीत अंगठी नव्हती. "पेटीतच तर ठेवली होती. काय झाली म्हणावयाची?" मनातल्या मनात महादू बडबडला.
ते पाहून जमीनदार हसत हसत खिशातून हात काढीत दाखवीत म्हणाला— "ही पहा, साखळी आणि ही हिऱ्याची अंगठी!"
दोघां नोकरांची तोंडे उतरली. दोघे माना खाली करून उभे राहिले.
"तुमची दोघांची परीक्षा घेण्यासाठी मी हे नाटक केले होते. माझी साखळी आणि अंगठी तुमच्यापैकी एकेकाच्या दृष्टीस पडेल अशी मीच टाकली. ती आणून कोण देतो हे मी पाहणार होतो. तुम्ही त्या चोरल्या नाहीत, हे खरे; परंतु तुम्ही त्यांच्या सहाय्याने परस्परांना चोर ठरविण्याचा आणि आपल्यावर माझा विश्वास जास्त बसवून घेण्याचा प्रयत्न करून पाहिलात. तुमच्यात सचोटी असू शकेल, परंतु तुमचे परस्परांशी वैर आहे. म्हणून मला तुमच्यामुळे विनाकारण कष्ट सहन करावे लागण्याची शक्यता आहे. बरं तर जा, आपापल्या घरी!" जमीनदार म्हणाला.
माना खाली घालून दोघे तेथून निघून गेले.