All Marathi Stories
पळालेला चोर
बाहेरच्या दाराची कडी वाजलेली ऐकताच रमाने स्वयंपाकघरातून धावत येऊन दार उघडले. तोपर्यंत चांगला काळोख पडला होता.
बाहेरचा माणूस तिला ढकलून आत शिरला आणि त्याने चटदिशी दार बंद करून घेतले व करड्या आवाजात म्हणाला— "ओरडलीस तर गळा दाबून टाकीन! खबरदार! मी तुरुंगातून पळून आलो आहे."
रस्त्यावर कोणी चारजण पळत असल्याचा आवाज ऐकू आला. ते चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागून धावत पळत येत होते.
त्यांना दूर जाऊ दिल्यावर रमाने हसत त्याला विचारले— "तुरुंगात आनंदाने रहायचे सोडून तू कोणते सुख मिळेल म्हणून बाहेर पळून आलास रे?"
"ते तू विचारायची गरज नाही. घरात आणखी कोण आहे?" चोराने विचारले रागावूनच.
"तुला भ्यायचे मुळीच कारण नाही. मी एकटीच आहे. स्वयंपाक अर्धा झाला आहे. स्वयंपाकघरात येतोस का?" असे म्हणत ती पुढे निघाली.
चोर तिच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेला. तिने पाट मांडला त्यावर बसला.
रमा वांगी चिरीत डोळ्यांतून पाणी काढीत होती. पदराने तिने डोळे पुसले.
"मी तुला काही केले नाही आणि तू मग हे डोळ्यांतून पाणी कां काढते आहेस?" चोराने तिला विचारले.
रमा म्हणाली— "तुला पाहून मला माझा दादा आठवला. रागाच्या भरात त्याने कोणाला तरी मारले आणि तुरुंगात जाऊन पडला आहे. परंतु तुझ्याच सारखा एकदा रात्री पळून आला. परंतु आला त्या क्षणापासून त्याच्या मनाला शांति अशी कधीच मिळाली नाही. घरातून बाहेर निघायची छाती नाही, बाहेर रस्त्यावर चालण्याचा आवाज झाला की त्याला वाटे पोलीस शिपाई आले की काय? वेड लागल्यासारखा करू लागला. जर तो पूर्ण शिक्षा भोगून आला असता तर त्याला ही धास्ती वाटली नसती. निर्भयपणे त्याला नवीन जीवन जगता आले असते.
"मी तसे त्याला सांगितले सुद्धा. परंतु त्याने माझे ऐकले नाही. दहा दिवस घरातच अज्ञातवास भोगला. दहाव्या दिवशी अचानक पोलीस शिपाई आले. घाबरून जाऊन तो गच्चीवर गेला आणि उडी मारून पळून जायच्या प्रयत्नात हातपाय मोडून घेतले आणि दोन दिवसात कायमचे डोळे मिटले."
"स्वयंपाक तयार आहे. जेवून घेतास का?" रमाने विचारले. चोराला जेवून घ्यावेसे वाटले, परंतु त्यांच्या मनात नान तऱ्हेच्या शंका येऊ लागल्या.
"यात काही विषबीष असेलसे वाटते आहे का तुला? तुझ्याच समोर तर स्वयंपाक केला मी." असे म्हणत रमाने समोर पत्रावळ ठेवली आणि चोराला वाढले.
चोर जेवू लागला. रमाने विचारले— "तू दिसायला बऱ्या घराण्यातला दिसतो आहेस, मग तुरुंगात कसा काय गेलास?"
चोर बोलू लागला— "मला माझ्या आई-वडिलांविषयी काहीच माहीत नाही. एका म्हाताऱ्या बाईने मला वाढवून लहानाचे मोठे केले. माझे लाड पुरविण्यासाठी तिने अनेक त्रास सहन केले. ती वारल्यावरच माझ्या नशिबाने पाठ फिरविली. मी शिकलेला नाही. आमच्या गावात काम करून मिळविण्यालायक काम नव्हते. म्हणून शहरात आलो. मला कोणी काम द्यायला तयार होईना. चार दिवस उपाशीच होतो. शेवटी असह्य झाले. तेव्हा एका व्यापाऱ्याची पैशाची पिशवी घेऊन पसार झालो. परंतु मला शिपायांनी पकडले आणि दोन महिन्यांची शिक्षा झाली."
"पण तू आता तुरुंगातून पळून कां आलास?" रमाने विचारले.
"तुरुंगात वाटेल ती कामे करावी लागतात. कपडे धुवा, चटई विणा, मागावर बसा, शिवण काम करा, वगैरे वगैरे. ही सर्व कामे मला नाही आवडत." चोर म्हणाला.
रमाने हसत विचारले— "तुला तुरुंगाबाहेर काम मिळत नव्हतं, म्हणून तू चोरी करून तुरुंगात गेलास. तिथे कामे फार म्हणून बाहेर पळून आलास! तर मग आतां काय करण्याचा विचार आहे?"
चोर काय उत्तर देणार? तो मान खाली करून गप्प बसून राहिला. तेव्हा रमाने पुन्हा विचारले— "या घटकेपासून तुला ज्या यातना भोगाव्या लागतील, त्या नरकयातने सारख्याच असतील. तुला जेवायला सुचायचे नाही की झोप लागायची नाही. पोलीस शिपायांची धास्ती तुझा पिच्छा पुरवील. तू खाणार काय आणि जगणार कसा? तुला कोण काय देणार? तुरुंगात तुला निश्चितपणे दोन वेळ खायला तरी मिळत होते. तुरुंगातून पळून आल्यामुळे दोन महिन्यांऐवजी आयुष्यभर शिक्षा भोगत राहिल्यासारखे होईल तुला! तुरुंगात राहून कपडे शिवायला, बागेत काम करायला किंवा आणखी असेच एखादे काम शिकून घेतले असतेच तर तुरुंगातून सुटल्यावर तुला पोटापाण्याची तरी काळजी राहिली नसती. तुरुंगात तुला खायला घालून कामधंदा शिकवीत होते. परंतु तू तर आता पळून आला आहेस, ही फार मोठी चूक केलीस."
ते सर्व ऐकल्यावर चोरालासुद्धा त्याची चूक झाल्यासारखेच वाटले. तो शांतपणे म्हणाला— "चूक तर झालीच, पण ही चूक सुधारायची कशी?"
"अजून फार उशीर झालेला नाही. तुला चुकीची दुरुस्ती करता येईल. तू स्वतःच तुरुंगाच्या दारासमोर जाऊन उभा रहा. कदाचित तुला जास्त शिक्षा किंवा दंड होणार नाही. थोडी झालीच तर शिक्षा भोगलीच पाहिजे. परंतु काम शिकून घ्यायला संधी मिळेल." रमाने त्याला समजावून सांगितले.
चोराला तो सल्ला ऐकून हलकेसे वाटले. म्हणाला— "तू सख्ख्या बहिणीसारखा मला सल्ला दिला आहेस. तुझे हे ऋण मी केव्हा फेडू शकेन नकळे. तर मग मी निघालो." असे म्हणत चोर निघाला.
चोर निघून गेल्यावर पुन्हा दरवाज्याची कडी वाजली. परंतु या खेपेस आलेली व्यक्ती म्हणजे रमाचे वडीलच होते.
रमाने चकित होऊन विचारले— "बाबा, आज तुम्हांला घरी यायला इतका उशीर कां झाला? आतांपर्यंत इतका उशीर कधीच झाला नव्हता."
"तुरुंगातून एक चोर पळून गेला आहे, म्हणून थोडा उशीर झाला." वडील म्हणाले. ते जेलरच होते.
रमा म्हणाली— "बाबा, तुरुंगात कैद्यांना जशी विचित्र वागणूक मिळते, त्यामुळे हे सर्व होते. तुरुंग म्हणजे गुन्हेगाराला फक्त शिक्षा भोगण्यासाठी कोंडवाडा नाही. त्यांच्या मनात बदल झाला पाहिजे व गुन्हा करण्याची इच्छा किंवा गरज त्यांना राहता कामा नये. तुमच्या तुरुंगातून पळालेला चोर आपल्या घरी आला होता. मी त्याच्या मनात बसलेल्या चोराला पळविले. त्यासाठी मी एका भावाची कल्पना केली होती." असे सांगून रमाने घडलेले वृत्त वडिलांना थोडक्यात सांगितले.
"शाबास मुली! तू एका तुरुंगाच्या अधिकाऱ्याची मुलगीच तर आहेस! मी जाऊन पाहून येतो, तो परत आला की नाही!" असे म्हणत रमाचे वडील निघालेच.
"बाबा, मी सांगितले ना, की तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही! त्याच्या मनातला चोर पळून गेला आहे. तुम्ही जेवून खाऊन स्वस्थपणे जा." असे सांगून रमाने वडिलांना जेवायला वाढले.