तीन चित्रकार
मलय राज्याचा केतुवर्मा याने आपला मुलगा जयवर्मा याचा विवाह करण्याचे ठरविले. मलय राज्याच्या सरहद्दीला कर्पूर राज्य होते. त्या देशाची राजकन्या पुष्पवल्ली नावासारखीच रूपवती होती. जयवर्माच्या विवाहाची गोष्ट निघाली तेव्हा तो आपल्या वडिलांना म्हणाला— "बाबा, लग्न करायचेच झाले तर मी पुष्पवल्लीशीच करणार!"
परंतु ते ऐकून केतुवर्माला आपल्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न जास्त कठीण वाटला. कारण मलय राज्य आणि कर्पूर राज्य यांचे काही काळापूर्वी एक भयंकर युद्ध झाले होते. राजाने आपल्या प्रधानाला सल्ला विचारला. प्रधान म्हणाला— "महाराज, आपले कर्पूर राज्याशी झालेले युद्ध फार पूर्वी झाले होते. म्हणून शत्रुत्वातला कडवेपणा तसा जास्त उरलेला नाही. म्हणून आपण आपल्याला जे वाटते आहे ते नि:संकोच कर्पूर देशाच्या राजाला कळवावे."
केतुवर्माने कर्पूर देशाच्या राजाच्या नावे पत्र लिहून आपल्या मुलाच्या विवाहाची गोष्ट कळविली व पुष्पवल्लीची एक तसबीर पाठवायला लिहिले. थोड्याच दिवसात पुष्पवल्लीची तसबीर केतुवर्माकडे आली. राजकन्येचे सौंदर्य पाहून राजकुमार जयवर्माच नव्हे तर सर्व दरबारीसुद्धा चकित झाले. परंतु दरबारी पंडितांपैकी एकजण म्हणाला— "महाराज, ही तसबीर काढणारा चित्रकार कर्पूर देशाचा आहे. आपल्या कुरूप राजकन्येला रूपवती दर्शविणे त्याला कठीण नाही. म्हणून आपण आपल्या देशाच्या चित्रकाराला पाठवून तिची तसबीर काढवून आणणे बरोबर होईल."
राजाला आपल्या पंडिताचा सल्ला संयुक्तिक वाटला. त्याने तिघा सुप्रसिद्ध चित्रकारांची नेमणूक त्या कामावर केली. तिघे चित्रकार आपले काम पुरे करून एका आठवड्याने परतले.
तिघांपैकी एकाने राजाच्या अंतःपुरातील सर्वांना त्याने काढलेली तसबीर दाखविली. ती पाहून राजा केतुवर्माच नव्हे तर इतर सर्वांना कमालीचे आश्चर्य वाटले. कर्पूर देशाच्या चित्रकाराने पाठविली होती त्या तसबिरीत काढलेल्या राजकन्येच्या सौंदर्यापेक्षा या तसबिरीतली राजकन्या जास्त सुंदर होती. राजाने त्या चित्रकाराला इनाम देऊन निरोप दिला.
दुसऱ्या चित्रकाराने काढलेली तसबीर राजाने पाहिली. त्या तसबिरीत राजकन्या अप्सरा लाजतील इतकी सुंदर दिसत होती. राजाने पहिल्या चित्रकारापेक्षा जास्त मोठे इनाम देऊन त्या दुसऱ्या चित्रकाराला पाठविले. तिसरा चित्रकार गप्पच होता. राजाने त्याला बोलावून विचारले— "तू काढलेली तसबीर कोठे आहे?"
तो म्हणाला— "महाराज, माफ करावे. मी तसबीर काढलेलीच नाही. तिचे सौंदर्य देवकन्येलाही लाजवील असे आहे. ते सौंदर्य फक्त पाहून मनात उतरविणे शक्य आहे. ते चित्रात उतरविणे कोणत्याही निपुण चित्रकारालाही शक्य नाही. म्हणून कर्पूर देशाच्या चित्रकाराने काढलेली तसबीर एक प्रकारची व आपल्या देशाच्या चित्रकारांनी काढलेल्या तसबिरी दुसऱ्या तऱ्हेच्या आहेत. तेव्हा राजकन्येचे खरे रूप कसे आहे हे ठरविणे आपल्याला शक्य होत नाही."
राजाला आपली चूक कळली व त्याने राजकुमारीची तसबीर न काढणाऱ्या चित्रकाराचा दरबारात योग्य सत्कार केला. त्यानंतर दरबारी पुरोहिताकरवी राजाने कर्पूर देशाच्या राजाकडे निरोप पाठवून राजकन्येला आपल्या युवराजासाठी मागणी घातली.