जावयाचा प्रताप
फार पूर्वी रामशास्त्री नावाच्या एका गरीब ब्राह्मणाला चार मुली होत्या. रामशास्त्र्याने चारही मुलींची लग्ने करून दिली आणि मुली सासरी नांदू लागल्या. परंतु मुलींच्या लग्नासाठी जे कर्ज काढले होते, त्याच्या ओझ्याखाली तो गरीब ब्राह्मण वाकून गेला होता. सावकाराला तोंड दाखविणे अशक्य झाल्यामुळे तो एके दिवशी रात्री घर सोडून निघून गेला.
तो जिल्ह्याच्या मुख्य गावी निघाला होता. वाटेवर एका गावी पोहोचला, तिथे एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर दोन-तीनशे वर्षांपासून एक मुंजा रहात असे. ती गोष्ट जवळपासच्या पंचक्रोशीत सर्वांना माहित होती. म्हणून कोणी त्या बाजूला वेळी-अवेळी फिरकत नसे. काळोख्या रात्री रामशास्त्रीला आलेला पाहून झाडावरच्या मुंज्याने दरडावून विचारले— "कोण तो? थांब पाहू!"
रामशास्त्रीच्या सर्वांगाला घामच सुटला, परंतु रामशास्त्री स्वभावाने थोडा धीटच होता. चार-चार मुलींची लग्ने करून देणे म्हणजे काही सामान्य पराक्रम नव्हे. म्हणून प्रसंगावधान राखून रामशास्त्र्याने स्वतःला सावरून तितक्याच करड्या स्वरात विचारले— "कोण तू?"
आपला आवाज ऐकून हा माणूस बेशुद्ध होण्याऐवजी आपल्यालाच दटावून विचारतो आहे, हे पाहून मुंजाला अपमान झाल्यासारखेही वाटले. झाडावरून उडी मारून रामशास्त्रीसमोर उभा राहून त्याने विचारले— "मी कोण आहे कळलं नाही वाटतं?"
रामशास्त्र्याने त्याला न ओळखल्याचे सोंग करून विचारले— "कोण रे बाबा, तू? या काळोख्या रात्री एकटा इकडे कसा काय आलास? एखादं जिवाणू निघालं तर? तू दिसायला नाजूक दिसतो आहेस!"
त्या मुंज्याच्या मनात शंका उत्पन्न झाली की सर्व लोक आपल्याला जसा भयंकर आकृतीचा मानतात, तसे आपण खरोखरच नाही वाटत. म्हणून तो रामशास्त्रीकडे साशंक दृष्टीने पाहत म्हणाला— "तू माझ्यासमोर हे नाटक काय चालवलं आहेस रे? मी या झाडावरचा मुंजा आहे आणि गेली तीनशे वर्षे या झाडावरच आहे!"
रामशास्त्र्याने त्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नसल्याचे दर्शवून म्हटले— "अशक्य, तुला काय वाटलं की मी मुंजाला ओळखत नाही? तू खरोखरच मुंजा असतास तर मला पाहून जागच्या जागी बेशुद्ध होऊन पडला नसतास का? तुला पाहून मला माझ्या जावयांना पाहून जे भय वाटते त्याच्या पावपटही वाटले नाही."
ते सर्व ऐकून मुंजा चकितच झाला. म्हणून रामशास्त्री पुढे म्हणाला— "तुझे डोळे किती शांत व सुंदर आहेत. तू किती रागावून माझ्यावर डोळे वटारून पाहिलेस तरी माझ्या जावयाच्या रागाच्या एक टक्क्यासुद्धा ते वाटणार नाहीत. तुझा आवाज सुद्धा कसा किरटा आहे! तू गरजलास तर मला माझ्या जावयांच्या हसण्याची आठवण होईल."
मुंजा विचार करू लागला— "तर मग मानवजातीत माझ्याहून जास्त भयंकर लोक आहेत वाटतं? गेल्या तीनशे वर्षात मानवजातीची शक्ती इतकी वाढली म्हणावयाची की काय?" ती शंका दूर करून घेण्यासाठी तो रामशास्त्रीला म्हणाला— "माझ्यात जी शक्ती नाही ती तुझ्या जावयांत कोठून येईल रे?"
रामशास्त्र्याने मुंजाकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहत विचारले— "काय रे, तुझे लग्न झाले आहे का?"
"नाही, परंतु लग्न झाल्याने काय होणार आहे रे?" मुंज्याने विचारले.
रामशास्त्री म्हणाला— "अरे भोळ्या मित्रा! तुला माहीत नाही वाटतं की लग्नाच्या वेळी जे वेदमंत्र म्हणतात त्यात किती शक्ती असते ती! त्या मंत्रांच्या बळाने अगदी सामान्य माणूस जावई होतो व त्याला अपार शक्ती प्राप्त होते. हेच पहा, माझे जावई डोळे वटारून माझ्या मुलीकडे, माझ्या बायकोकडे किंवा माझ्याकडे पाहू लागले की आम्ही जागच्या जागी थिजून जातो. ते ओरडतात तेव्हा आम्ही त्यांच्या पाया पडतो व क्षमा मागतो. म्हणून तुझ्या रागाचा किंवा ओरडण्याचा परिणाम माझ्यावर मुळीच पडत नाही." रामशास्त्री म्हणाला.
ते ऐकून मुंजा विचार करू लागला की जर हा ब्राह्मण म्हणतो ते खरे असेल तर लग्न झाल्याबरोबर माणसांना नवी शक्ती मिळत असणार, म्हणजे मला भिणारा कोणी राहणारच नाही. म्हणून आपणसुद्धा लग्न करून आपली शक्ती वाढविली पाहिजे.
रामशास्त्र्याने मुंज्याच्या चेहऱ्यावरून ओळखले की त्याच्या मनात काहीतरी खळबळ उडाली आहे. म्हणाला— "अरे मुंजा, तू तरी किती दिवस असा मुंजाच राहणार? तू सुद्धा लग्न करून आपला प्रताप वाढव." असे सांगून रामशास्त्री तेथून पाय काढण्याचा विचार करू लागला.
मुंजाला रामशास्त्रीचा सल्ला पसंत पडला. त्याने रामशास्त्रीला थांबवून विचारले— "काय हो, तर मग माझे लग्न कोण करून देणार? तुम्हीच मेरेसाठी एखादी मुलगी पहा न!"
"आता हे पहा, आमच्या मानवजातीत तुला चित्त पडणारे कित्येक लोक आहेत. कोणी झाला तरी तो आपल्या मुलीला चांगल्या घराण्यात देणार. तुझ्यासारख्या भोळ्या-भाबड्या व गरीबाला कोण मुलगी देईल?" रामशास्त्री म्हणाला.
मुंज्याच्या मनात लग्न करून आपली शक्ती वाढविण्याची इच्छा जास्तच वाढली. आता तो थोडा नमला व रामशास्त्रीचेच पाय धरू लागला. रामशास्त्री बराच वेळ आपल्याच ऐटीत राहिल्यावर म्हणाला— "हे पहा, हे काम तेवढे सोपे नाही. यासाठी पुष्कळ पैसे खर्च करावे लागतात. तू जर हे सांगू लागलास की तू याच वडावर राहतोस तर तुला कोण आपली मुलगी देईल?"
"तुम्ही पैशाची फिकीर करण्याचे कारण नाही. मुलगी शोधायला जो खर्च होईल तो मी देईन. शिवाय तुम्हांला चांगले बक्षिससुद्धा देईन. लग्न झाल्यावर मी एक मोठा वाडा बांधून त्यात रहायला जाईन." असे सांगून त्या मुंज्याने सोन्याच्या मोहोरांनी भरलेला एक हंडा रामशास्त्रीला आणून दिला.
रामशास्त्र्याने होकारार्थी मान हलवून म्हटले— "परंतु माझी एक अट आहे. जोपर्यंत मी तुझ्यासाठी मुलगी शोधून आणीत नाही, तोपर्यंत तू कोणत्याही मानवाच्या दृष्टीस पडता कामा नये. कारण हे कळलं की नवऱ्यामुलाचं घर वडाच्या झाडावर आहे, तर मुलगी ठरवून आलो तरी ते लग्न मोडेल. नंतर तुला पाहतील ते लोक सांगत सुटतील की तू अशक्त आहेस आणि तुला आपली मुलगी देणारच नाहीत. ते म्हणतील— 'जर माणसातच मोठमोठे श्रीमंत आणि बलदंड लोक आहेत तर आपल्या मुलीला अशक्त मुंज्याच्या गळ्यात बांधून आपली नाचक्की कशासाठी करून घ्यावयाची?'"
म्हणून मुंजाला रामशास्त्री म्हणाला ते खरे वाटले. त्याने रामशास्त्रीला वचन दिले की लग्न होण्यापूर्वी तो कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही. त्यानंतर त्या मुंजाला कोणी त्या वडावर पाहिले नाही. पुढे काही वर्षांनी म्हातारी माणसं गावातल्या तरुणांना सांगू लागली की या वडावर एक मुंजा होता, तर तरुण मंडळी त्याच्या बोलण्यावर विश्वासच करीनाशी झाली. तरुण मंडळी म्हणत, "हा तुमचा अंधविश्वास आहे हो!"
रामशास्त्री मोहोरांचा हंडा घेऊन घरी आला. त्याने आपले सर्व कर्ज फेडले. जावयांनी जे जे मागितले ते त्यांना दिले आणि पुढील आयुष्य आनंदाने घालविले.