Bookstruck

एकाच माळेचे मणी

रामपूरचा राम काही जरुरी कामासाठी सीतापूरच्या सीतारामकडे जायला निघाला. वाटेत लक्ष्मणपूरला पोहोचता पोहोचताच दुपार झाली. त्याला खूप भूक लागली. समोर दिसणाऱ्या घराशी तो थांबला. त्या घरातले सर्वजण ठार बहिरे होते. रामने बाहेर कट्ट्यावर बसलेल्या तरुणाला विचारले, "बेटा, एक वाटसरू आहे मी. तुझ्या घरात काही खायला मिळेल का याची चौकशी कर ना आत जाऊन." तरुण घरात गेला अन् आपल्या बहिणीला शिव्या देत म्हणाला, "तो माणूस म्हणतोय की, तू त्याच्याशी लग्न करायचं कबूल केलंस. लोकांना याबद्दल काही कळलं तर आपलं नाकच कापलं जाईल." अन् तो बडबडत राहिला. रागाने फणफणत ती आपल्या पित्याकडे जाऊन म्हणू लागली, "बाबा, हा काय अन्याय? दादा मला म्हणतोय की, मला इस्टेटीतली एक फुटकी कवडीही नाही मिळणार! बापाच्या इस्टेटीत मुलीचाही हक्क असतो! त्या बहिरेभटाला हा कायदा माहीतच नसावा! जमीनदाराकडे जाऊन तक्रार करीन, चांगले फटके मारवीन मी त्याला." तिचे वडील हातचे काम सोडून देऊन तिरमिरीत ते आडाचे पाणी काढत असलेल्या बायकोकडे वळले. ते ओरडले, "अगं कैदासणी, आपल्या लेकीला असं म्हणायची तुझी हिम्मतच कशी झाली, की तुझ्या बाबांसाठी मी मुळीच स्वयंपाक न करता त्याला उपास घडवीन? अगं, तुला तर धड स्वयंपाकच करता येत नाही. भाजीबिजी तर सोडच, पण तुझ्या घराण्यात कुणाला धड भातसुद्धा शिजवता येत नाही! तुझ्याशी लग्न कसलं केलं, गळ्यात फासच अडकवून घेतला आपल्या!" तोही असाच रागाने खवळला होता. आता त्याच्या बायकोने हातातली दोरी सोडून दिली अन् पाण्याचा घडा घडामकन विहिरीत पडला. आपल्या नवऱ्याची काहीही पर्वा न करता संतापलेल्या कालीमातेसारखी ती सरळ आपल्या सासूजवळ जाऊन बडबडू लागली, "तुम्हाला झालंय तरी काय? अक्कल काय अगदीच शेण खायला गेली का? मुलगा चांगला चाळीस वर्षांचा झाला, तरी त्याला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देताय? माझा सूड उगवायचा विचार दिसतोय तुमचा! पण मीही काही गप्प नाही बसणार. आपल्या पैशांच्या बळावर काहीही करू शकायला तो काय कोणी मोठा जमीनदार लागून गेलाय की काय? या गावच्याच काय, पण नदीपलीकडल्या गावच्या मोठमोठ्या लोकांनाही बोलावून आणायची हिम्मत आहे माझ्यात. त्यांच्याच हातून तुम्हा लोकांना बेतानं फोडून काढीन!" अंगात भूत संचारल्यासारखीच बोलत होती ती. म्हातारी आपल्या हातातला कापूस खाली टाकत म्हणाली, "हं, आता बरोबर पित्तळ उघडं पडलं बघ तुझं! तूच शाबीत केलंस, की तू रुद्राची मुलगी आहेस. मला घरातून जायला सांगणारी कोण ग तू? हे माझ्या नवऱ्याचं घर, सध्या ते माझ्या मुलाचं असून, पुढे माझ्या नातवाचं होईल ते. नीट कान उघडून ऐक. माझ्या सासऱ्याच्या पणज्यानं - सूरदासानं - बांधलेलं घर आहे हे. जिवात जीव असेपर्यंत इथेच राहणार मी! पहातेच काय करशील माझं ते!" अन् लढायला उठल्यासारखा आपला पदर तिनं कमरेला घट्ट आवळून खोचला. रागाने कापतच होती ती. एकाचे बोलणे दुसऱ्याला समजत तर नव्हतेच. पण सर्वजण जोरजोरात ओरडून एकमेकांना शिव्या देऊ लागले. थोड्या वेळात सगळे पाटलाकडे जाऊन तक्रार करायला घराबाहेर आले. मोठ्या सोशिकपणे कट्ट्यावर बसून वाट पाहणारा राम सर्वजणांना बाहेर आलेले पाहून आनंदाने म्हणाला, "अरे वा! तुम्ही सगळी किती चांगली माणसं आहात! दारच्या वाटसरूबद्दल इतका आदरभाव मी कधीच पाहिला नाही अन् ऐकलाही नाही. अतिथीला जेवायला बोलवायला इतकी सगळीजण एकदम बाहेर आलात! आपल्या गावचं काय नाव म्हणालात तुम्ही? मर्यादापूर ना? वा, अतिथी सत्काराला शोभेलच नाव आहे." अन् मोठ्या आनंदाने तो कट्ट्यावरून उठला. पण रागाने जळणारा त्या घरातला मोठा माणूस ओरडला, "अरे तू कोण रे आमच्या घरच्या भानगडीत दखल देणारा? आमच्या आपसातल्या झगड्यात तू उगीच आपलं नाक खुपसू नकोस हं. आम्ही थोडेच कोणा बाहेरच्या माणसांशी भांडलोय. आपसात आम्ही भांडू. नाहीतर प्रेमानं गळ्यात गळे घालू. न बोलावता उगाच आमच्या घरात घुसायचा तुला काय रे अधिकार? जा इथून; जा आपल्या वाटेनं!" त्याचे बोलणे ऐकून राम आश्चर्यातच पडला. घाबरत तो म्हणाला, "बापरे! हा काय अन्याय! एक वेळच्या जेवणाचे दहा रुपये? इतकी मोठी रक्कम माझ्याजवळ असती, तर मला भूकच नसती लागली, अन् तुमच्या घराच्या कट्ट्यावर बसायची वेळही नसती आली माझ्यावर!" आता मुळीच वेळ न घालवता तो त्या गल्लीतून धावतच दूर जायला निघाला. खरी गोष्ट अशी, की हा रामपूरचा रामही अगदी ठार बहिरा होता! सगळे एकाच माळेचे मणी!