Bookstruck

अनुपस्थितीत

सीतारामची अरुणा ही एकुलती एक मुलगी. खूप सुस्वभावी अन् सुंदर होती ती. जवळच्या गावच्या वीरदासकडून बातमी मिळाली की, आपला मुलगा जयंत याच्यासाठी त्याला अरुणा पसंत आहे. पण खुद्द तो कसा आहे, त्याची परिस्थिती कशी आहे, इत्यादी जाणण्यासाठी सीताराम वीरदासच्या गावी गेला. वीरदास सुसंपन्न असून चांगला सुशिक्षितही असल्याचे सीतारामने जाणले. गावात त्याला चांगला मानही होता. त्याने सीतारामचे उत्तम स्वागत केले व तो म्हणाला, "माझ्या ओळखीतील बऱ्याच लोकांकडून तुमची अरुणा फार चांगली असल्याचे ऐकलं. मला हुंडाबिंडा काहीही नको. फक्त शास्त्रोक्त विवाह करून देऊन सूनबाईला माझ्या घरी पाठवा म्हणजे पुरे मला." जयन्तही दिसायला उमदा वाटला. सीतारामला हे स्थळ खूप आवडले. गावी परत येऊन त्याने सर्व काही घरच्यांना सांगितले. अशातच शान्ताराम नावाचा एक माणूस सांगू लागला, "वीरदास म्हणे कोणाशी बोलताना म्हणाला की, सीतारामचं घराणं दरिद्री आहे. त्याच्या मुलीचा उद्धार व्हावा म्हणूनच केवळ, हुंडाही न घेता मी तिला सून करून घ्यायला तयार झालोय. भिकाऱ्याकडून कधी कोणी पैसे घेतं का?" सीतारामच्या घराण्याबद्दल बोलताना तो वारंवार त्याची टिंगलही करत होता म्हणे! शान्तारामचे बोलणे ऐकून सीतारामला फार वाईट वाटले. त्याचे वडील रघुराम मध्ये पडून म्हणाले, "अगीच कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तू स्वतः जाऊन वीरदासला भेटणं योग्य होईल." सीतारामला त्यांचा सल्ला योग्य वाटला. जे ऐकले ते खरे निघाले तर त्याने लग्न मोडून परत येण्याचा निश्चय केला. वाटेत सीतारामला एक शेतकरी भेटला. त्या शेतकऱ्याने आपल्या शेताचा एक भाग वीरदासला स्वस्तात विकला होता. पण त्याला कोणीतरी म्हणाले की - "ती शेतजमीन नापीक असूनही हा शेतकरी गरीब असल्याने आपण ती विकत घेतल्याचे वीरदास कोणाजवळ सांगत होता! शेतकऱ्याला दानच दिलेय अशी त्याची भावना होती म्हणे!" या बाबत बोलण्यासाठीच तो शेतकरी वीरदासकडे निघाला होता. सीताराम शेतकऱ्याला म्हणाला, "बरं झालं, आपण दोघं बरोबरच जातो आहोत." ते दोघा पुढे जाताच आपल्या घोडागाडीची दुरुस्ती करून घेत असलेला एक माणूस त्यांना दिसला. त्याची परिस्थिती हलाखीची असताना वीरसिंहने त्याला एक हजार रुपये कर्जाऊ दिले होते. त्या भांडवलातून याने शहरात व्यापार केला अन् पुष्कळ धन कमवले. व्यापाऱ्याने नंतर वीरसिंहला त्याची रक्कम परत केली. अन् शिवाय दर वर्षी काही न काही मूल्यवान भेटवस्तू त्याच्याकडे पाठवत राहिला. पण आता असं ऐकिवात आले की वीरदास त्याला 'कृतघ्न' म्हणून त्याची आणखीही निंदा करत असतो. याबाबत चौकशी करण्यासाठी तो ही वीरदासच्या गावी निघालेला होता. व्यापाऱ्याला जेंव्हा कळले की सीताराम आणि शेतकरीही अशाच चौकशीसाठी वीरसिंहकडे निघालेले आहेत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "थोडे थांबा ना! माझी गाडी आत्ता दुरुस्त होईल. आपण तिघंही गाडीतूनच जाऊ बरोबर." ते तिघे पुढे निघतात तोच त्यांना रस्त्यात एक कवि भेटला. तो सांगू लागला की, "या वीरदासने माझा एका जमीनदाराशी परिचय करून दिला. मला त्याच्या मुळे धनलाभ झाला अन् कीर्तीही मिळाली. पण माझ्या असं ऐकिवात आलंय की, मी त्याच्या स्तुतीपर एक ही काव्य न लिहिल्यामुळे तो माझ्यावर नाराज आहे. सुरुवातीला मी त्याच्याबद्दल खरं तर एक कविता लिहिली होती. पण ती ऐकून तो म्हणाला होता की - मी एक सर्वसाधारण माणूस असून माझ्याबद्दल कोणी कविता लिहावी अशी माझी योग्यता नाही. अन् आज मात्र माझी निंदा करतो आहे! मी आता जाब विचारायलाच त्याच्याकडे निघालोय." आता कवीही बाकी तिघांबरोबर घोडागाडीत बसला. त्यांना वीरदासच्या घरी पोचता पोचता संध्याकाळ झाली. त्यावेळी वीरदास बाहेर ओट्यावर बसून कोणाशीतरी बोलत होता. गाडीतून उतरलेल्या चौघांना पाहून प्रेमाने तो त्यांचे स्वागत करत म्हणाला, "अरे, तुम्ही एकदम बरोबर आलेले पाहून मला फारच आनन्द झालाय." त्यांना आपल्या घरात घेऊन गेला व नोकरांना त्याने आज्ञा दिली की, हे चौघेही मला आपल्या नातेवाइकांपेक्षा प्रिय आहेत. त्यांच्या आगतस्वागतात कुठेही काही कमी पडता कामा नये. त्याच्या चेहऱ्यावरील खरा प्रेमभाव व पावित्र्य पाहून चारही जण चुप झाले. पण मनात मात्र अजूनही राग धुमसतच होता, त्यामुळे त्यांना घरात वावरायलाही संकोच वाटला. इतक्यात कट्ट्यावर बसलेला दुसरा माणूस वीरदासला म्हणाला, "अरे, तुम्ही अजून माझ्या म्हणण्यावर आपला काहीच निर्णय नाही दिला?" "निर्णय देण्याची जरूरच काय मुळी? मी एकदा जे वचन दिलं ते दिलं. मी ते कोणत्याही परिस्थितीत पाळणार! माझा नियमच आहे तो. मी आपलं बोलणं फिरवत नसतो." वीरदास उत्तरला. तेंव्हा कट्ट्यावरून उतरून या चार पाहुण्यांजवळ येत तो म्हणू लागला, "तुम्ही जर यांचे स्वकीय आहात, तर जरा यांना समजवा नं? उपकार करा माझ्यावर एवढा." खरं काय घडलंय हे जाणायला चारही जण उत्सुक होते. तेंव्हा तो माणूस सांगू लागला - गावात वीरदासचं आणखी एक घर आहे. प्रथम तो त्याच घरात रहात असे. श्रीमन्ती आल्यावर आता तो या मोठ्या घरात रहायला लागलाय. खूप दिवस मंगलकार्यात वगैरे आलेल्या पाहुण्यांची उतरायची सोय तो जुन्या घरी करत असे. पण आता त्या घराचा उपयोग फार कमी होऊ लागल्याने ते उजाड पडल्यासारखं झालं. सूरज नावाच्या एका शेतकऱ्याला ते आपण विकत घ्यावे असे वाटले. वीरदासनेही मान्य केले की, मी ते घर स्वस्तात देईन. सूरज आता पैसे जमा करायच्या कामाला लागलाय. त्याच गावातल्या गणनाथाने सूरजच्या भाग्याबद्दल त्याची प्रशंसा केली. आणि त्याबरोबरच वीरदासच्या औदार्याचीही वाखाणणी केली. तर उलट सूरज तिरस्काराने म्हणाला, "हो, घरात तशी भुताप्रेतांची वस्ती आहे. फुकट सुद्धा घ्यायला कोणी तयार नाही होणार. पण मीच काय तो पैसे देऊन ते खरेदी करतो आहे! यात त्याचा भलेपणा तो कसला? यात माझंही कसले मोठंसं भाग्य नव्हे, अन् वीरदासचंही औदार्य नव्हे! मला गरज होती, मी घेतलं, बस, बात खतम!" आता गणनाय म्हणतोय की, असल्या या कृतघ्न माणसाला कशाला स्वस्तात देता घर? त्यापेक्षा ते गणनाथाला दिलं तर तो आजन्म ऋणी राईल वीरदासंचा; अगदी पूजाही करील तो. पण वीरदास तर आपल्याच शब्दावर अडून राहिला आहे. तो कोणत्याही परिस्थितीत आपला दिला शब्द मोडायला तयार नाही. सीताराम व बाकीचे तिघेजण काही बोलण्यापूर्वीच वीरदास म्हणाला, "माणूस समोर नसला, की आपला हेतु साध्य करण्यासाठी लोक त्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी करतात, तऱ्हे-तऱ्हेच्या कपोलकल्पित गोष्टी रचल्या जातात अन् माणसाच्या अनुपस्थितीत त्याला वाईट ठरवायचे प्रयत्न केले जातात. मी असल्या गोष्टींवर अन् बातम्यांवर कधीही विश्वास नाही ठेवत. माझ्या दृष्टीने माणसाच्या पाठीमागे त्याच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींना काहीही किंमत नाही, जे समोर घडेल, तेच माझ्या दृष्टीने मुख्य होय. हाँ, अशा सांगोवांगी आलेल्या गोष्टी एखाद्या वेळी खऱ्या असतीलही; पण तिकडे लक्ष देणं अन् त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही माझी पद्धत नव्हे. ही माझी माणसं आहेत नं, ती माझ्याच म्हणण्याला दुजोरा देतील पहा. ते कधीही आपलं मत तुमच्या बाजूने देणार नाहीत हे समजून अस. ते माझ्या पद्धतीचंच समर्थन करतील नक्की! आता जाऊ शकता तुम्ही." हे वीरदासचे बोलणे ऐकून या चौघांचेही चेहरे पाहण्यासारखे झाले! आतापर्यंत ते केवळ वीरदासबद्दलच विचार करत होते, स्वतःबद्दल नव्हते करत! त्यांनी ओळखले की वीरदास कोणाच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल दुसरे बोलतो यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. आता तेही विचार करू लागले की आपणही इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वीरदासला वाईट का ठरवला? 'काही जरुरी काम आहे' असे म्हणत सीताराम अन् बाकीचे तिघे तेथून सटकले. पण चौघं एकदम कसे व का आले अन् काही न बोलताच निघून चाललेत हे वीरदासला कळेना. इतके जर महत्त्वाचे काम नव्हते, तर ते इथे आलेच का मुळी? यामुळे वीरदासला फार आश्चर्यही वाटले. सीताराम व बाकी तिघेजण खरे तर सगळी चौकशी करून सोक्षमोक्ष लावायला आले होते. पण आता त्यांना आपल्या शंकेचे उत्तर परस्परच मिळाले. आता उलट त्यांना वीरदाससारख्या सच्च्या, प्रामाणिक व आदर्श व्यक्तीचे आपण आप्त, स्वकीय असल्याबद्दल गर्व वाटू लागला. त्याच्या स्वभावाचा त्यांच्यावर फारच अनुकूल परिणाम घडून आला. त्यांच्या लक्षात येऊन चुकले की माणसाच्या पाठीमागे त्याच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. घातक आहे ही सवय.