Bookstruck

अंधत्वाची फिकीर

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला— "राजा! या जगात किती मोठी योग्यता असली तरी कधी-कधी मान खाली होते. त्याचे उदाहरण म्हणून मी तुला विष्णुशास्त्रींची गोष्ट सांगतो. लक्ष देऊन ऐक." असे सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला. फार पूर्वी बंगदेशावर चंद्रवर्मा नावाच्या राजाचे राज्य होते. तो विचारी व शांत स्वभावाचा होता; राज्यकारभारातही तो कुशल होता. परंतु त्याला ज्योतिषशास्त्राचे इतके वेड होते की, कोणी ज्योतिषी आला तरी तो त्याला आपली जन्मकुंडली दाखवून भविष्य सांगायला सांगे. एकदा त्याच्या दरबारात विष्णुशास्त्री नावाचा एक ज्योतिषी आला. राजाने त्याला आपली जन्मकुंडली दाखवून भविष्य वर्तवण्यास सांगितले. विष्णुशास्त्रीने राजाची जन्मकुंडली लक्षपूर्वक पाहिली व म्हणाला— "महाराज, जो खरा ज्योतिषी असतो त्याने कोणाच्या तोंडाकडे पाहून ज्योतिष सांगू नये. तेव्हा जसे आहे तसे मी सांगतो, राग मानू नये. बरोबर अठरा वर्षांनी या देशात दुष्काळ पडेल. तो दुष्काळ फक्त एक वर्षभर राहील. परंतु दुष्काळ संपल्यावर बरोबर दोन वर्षांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाण्याची भीती आहे. मी हे भविष्य सांगितल्याबद्दल क्षमा करावी. राग मानू नये." "परंतु शास्त्री बुवा, हे संकट टाळायला काही उपाय असेल की नाही?" राजाने नम्रपणे विचारले. विष्णुशास्त्रीने पुन्हा आडव्या-उभ्या रेषा काढल्या आणि काही गणित करून म्हटले— "एक मार्ग आहे. परंतु ती गोष्ट आपण कोणाला सांगता कामा नये. एक कुरूप असा मांत्रिक आपण न बोलावता आपल्याकडे येईल. त्याच्या मंत्रबळाने आपली नेत्रज्योती जाणार नाही. त्याहून जास्त मला काही सांगता येणार नाही." राजाने विष्णुशास्त्रींना बिदागी देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्यानंतर अठरा वर्षांनी विष्णुशास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे देशात दुष्काळ आला. परंतु राजाने पूर्वीच काळजी घेऊन अन्नधान्याचा भरपूर पुरवठा करून ठेवला असल्याने प्रजेला फारसा त्रास झाला नाही. दुसऱ्या वर्षी नेहमीप्रमाणे पाऊस पडला. दुष्काळात राजाने आपणास वाचवले म्हणून प्रजेने राजाची फार स्तुती केली. परंतु राजाला दुसरीच काळजी वाटत होती. अठरा वर्षांनी दुष्काळ येईल असे विष्णुशास्त्रींनी सांगितले होते, ते खरे ठरले; त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांची ज्योती जाणार हे भविष्यही खरे ठरणार, असे वाटून राजा काळजी करू लागला. 'कोण कुरूप मांत्रिक येऊन आपल्यावरचे हे संकट टाळण्यास मदत करतो' या गोष्टीची राजा वाट पाहू लागला. त्याच सुमारास त्याच्याकडे कलिंग देशाच्या राजाकडून व काश्मीरच्या राजाकडून जवळजवळ एकाच वेळी एकाच तऱ्हेचा निरोप आला. त्यांच्यावर प्राणसंकट आले असताना वरुणशास्त्री नावाच्या कुरूप मांत्रिकाने येऊन होम, जपतप करून एक मंत्रलेले कंकण हातात बांधले व त्यामुळे जीवावरचे संकट टळले. कलिंग राजाने पुढे असे लिहून पाठवले— "आम्ही वरुणशास्त्रींना आमच्या दरबारात राहावे अशी आग्रहाची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी जन्मस्थान आपले कोठे आहे, स्वतःचे हे सांगण्याचे सुद्धा नाकारले. तरीपण आम्ही आमच्या शिपायांना त्यांच्या पाठोपाठ पाठवून ते आपल्या देशाचेच रहिवासी असल्याची माहिती मिळवली आहे. अशा मांत्रिकाकडून आपल्याला येणारे अंधत्व टाळता आले तर टाळावे." ती पत्रे पाहून राजाला वाटले की तो वरुणशास्त्री आपल्याकडे लवकरच येईल. राजाचा अंदाज बरोबर निघाला. एका आठवड्याने वरुणशास्त्री आला. त्याचे वय सुमारे पंचवीस वर्षांचे होते. तो लठ्ठ, काळा, दात पुढे आलेले दिसायला अगदी कुरूप होता. चंद्रवर्माने त्याचे आदरातिथ्य करून त्याला आपली जन्मकुंडली दाखवली. ती पाहून वरुण म्हणाला— "महाराज! आपण सूर्योपासना आणि जप वगैरे करायला हवेत. आपल्या डोळ्यांची ज्योती जाणार असे दिसते आहे. परंतु मी या संकटातून आपणास वाचवू शकेन." चंद्रवर्माने सांगितल्याप्रमाणे सूर्योपासना, जप वगैरे केले. तो सर्व विधी संपल्यावर वरुणशास्त्री म्हणाला— "महाराज! आपल्याला इष्ट असेल ती बिदागी देऊन निरोप द्यावा." राजाने त्याला गप्पागोष्टीत विचारले— "शास्त्रीबुवा! आपले वडील कोण? कोठे राहतात व काय करतात?" वरुणशास्त्री म्हणाला— "माझे वडील माझ्या लहानपणीच वारले." राजा म्हणाला— "असं होय! अरेरे! आपल्यासारख्या प्रतिभाशाली विद्वानरत्नाला जन्म देणारा तो भाग्यवान पिता कोणत्या लोकात वास करीत आहे, त्या परमेश्वरालाच माहीत! आपण आपल्या वडिलांच्या श्राद्धाच्या आधी यावे, त्यांचे श्राद्ध थाटामाटाने करू. त्यानंतर आपल्याला भरपूर बिदागी वगैरे देऊन आपला सत्कार करण्यात येईल." वरुणशास्त्री म्हणाला— "आमच्या वडिलांचे श्राद्ध परवा आहे, म्हणून मला लवकर घरी जाणे आवश्यक आहे!" चंद्रवर्मा म्हणाला— "तसे असेल तर जाण्याची गरजच नाही. इथेच थाटाने श्राद्ध करू. गावातल्या सर्व ब्राह्मणांना बोलावून संतर्पण करू. परवा संध्याकाळी तुमच्या बिदागी वगैरेचा समारंभ होईल." वरुणशास्त्रीने कोणालाच बोलाविले नाही. परंतु चंद्रवर्मा विष्णूशास्त्रींना खास निरोप पाठवून बोलावून वरुणशास्त्रींची ओळख करून देत म्हणाला— "आपण यांच्या वडिलांचे श्राद्ध आहे, थाटामाटाने श्राद्ध झाले पाहिजे बरं का? यांच्या वडिलांच्या आत्म्याला पूर्ण शांती लाभली पाहिजे!" परंतु विष्णुशास्त्रींच्या तोंडावर आनंदाची एक छटासुद्धा दिसली नाही. श्राद्धविधी संपत आला आणि पिंडदान करण्याची वेळ आली. नेमके त्यावेळी विष्णुशास्त्री ओरडून म्हणाले— "थांबा!" चंद्रवर्माने लगेच सर्व विधी थांबवायला सांगितला आणि म्हणाला— "या वरुणशास्त्रीला एक महिनाभर तुरुंगात डांबून ठेवा आणि या विष्णुशास्त्रींना ज्योतिष सांगण्याचा अधिकार मी काढून घेतो. यांच्या ज्योतिषावर कोणी विश्वास ठेवू नये अशी राज्यभर दवंडी पिटवा." त्या दिवशी सायंकाळी चंद्रवर्माने विष्णूशास्त्रीला शंभर वराह देऊन निरोप दिला. जाताना विष्णूशास्त्रीने चंद्रवर्माच्या कुशाग्र बुद्धीची व उदार हृदयाची वाखाणणी केली. येथवर गोष्ट सांगून वेताळाने विचारले— "राजा! विष्णूशास्त्रींनी श्राद्धकर्म मध्येच का थांबविले? त्याच्या ज्योतिषावर कोणी विश्वास ठेवू नये, राजाने अशी दवंडी पिटायला का सांगितली? राजावर ओढवणारे संकट टाळायला कारण झालेल्या वरुणशास्त्रीला तुरुंगवासाची शिक्षा का झाली? या प्रश्नांची उत्तरे माहीत असून तू दिली नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील." विक्रमादित्य म्हणाला— "वरुणशास्त्री हा विष्णूशास्त्रींचाच मुलगा असल्याचे राजाला स्पष्ट झाले. कुशाग्र बुद्धी चंद्रवर्माला ती गोष्ट रुजू करण्यात यशस्वी झाले. त्याला संशय यायला मुख्य कारणे झाली ती कलिंगराजाची आणि काश्मीरच्या राजाची पत्रे. त्या राजांनी वरुणशास्त्रीनेच चंद्रवर्माच्या नेत्ररोगाची गोष्ट सांगितली असली पाहिजे. वरुणशास्त्री त्यापूर्वी चंद्रवर्माला भेटला नव्हता किंवा त्याने राजाची जन्मकुंडली पाहती नव्हती. त्याला विष्णूशास्त्रींकडूनच राजाच्या नेत्ररोगाची गोष्ट कळली असावी. त्याच्याकडून राजाने बापाचे श्राद्ध करविले. तो दुसऱ्याचे गंडांतरे मंत्रबळाने दूर करीत होता तर त्याला देवाची फिकीर करण्याचे कारणच काय? तो खरोखरच मांत्रिक होता तर कोणाच्या दरबारात राहायला नकार देण्याचे त्याला कारणच नव्हते. आपल्याला थोर कीर्ती किंवा प्रतिष्ठा नसल्याने चंद्रवर्मा राज्यात राहायला आग्रह करणार नाही अशी वरुणशास्त्रींची समजूत होती. स्वतःचा देश लपवून ठेवण्याची त्याला गरज नव्हती. तो शिक्षा करण्यायोग्य लबाडच होता. विष्णुशास्त्री चांगला ज्योतिषी नव्हता असे म्हणता येणार नाही, कारण फार पुढे येणाऱ्या दुष्काळाची गोष्ट त्याने बरोबर सांगितली होती. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आड त्याने आपल्या मुलाच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने दुसरे खोटे भविष्य वर्तवले होते. एवढेच नव्हे तर दूर-दूरच्या राजांना खोटे भविष्य सांगून आणि आपल्या मुलाला मांत्रिक म्हणून त्यांच्याकडे पाठवून त्यांच्यावरची खोटी संकटे दूर करविण्याचे नाटक विष्णुशास्त्रीने केले. म्हणून विष्णूशास्त्रींचा ज्योतिष सांगण्याचा अधिकार राजाने काढून घेतला. परंतु त्याच्यात प्रतिभा होती ती ओळखून चंद्रवर्माने त्याला शंभर वराह पारितोषिक म्हणून दिले. आपले गुपित राजाने बरोबर ओळखले हे कळल्यावर आपल्याला शिक्षा न करता पारितोषिक देऊन राजाने निरोप दिला, याबद्दल राजाच्या औदार्याची वाखाणणी विष्णुशास्त्रीला करावी लागली." अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग झाल्यामुळे वेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हा झाडाला जाऊन लोंबकळू लागला.